Monday, 12 September 2016

"जवाहर"

"अय मंग्या, अजून एक प्लान आहे. "
"बोल"
"सकाळी तिथून लवकर निघून अशेरी करायचा का ? "
"मला काहीही चालेल "
" बर"
....
....
....
..
...
..
"काय करायच रे " इति मी
"सेगवा पण करू शकतो, अहमदाबाद हायवेलाच आहे" - आदित्य
"हां"

....
....
....
...
"शेवटी काय ठरलाय प्लान आपला " - आदित्य
"एक मस्त प्लान आहे ...."
"काय ? "
"सगळ्यात आधी ठरलेलाच ... :P"

काही अश्या पद्धतीत आमचं (मी आणि आदित्य ) भुपतगड ट्रेकचं प्लानिंग चालू होतं. सगळ्यात आधी ठरलेलं कि भूपतगड आणि धाबोसा धबधबा बघायचा (ओंकार ओक बाबांची आमच्यावर खूप माया ... त्यांनीच हा प्लान दिलेला आशीर्वाद म्हणून ... ) .... . पण या पावसामधे एवढ्याश्या गोष्टींवर आमचं समाधान होईना. मग आदित्य म्हणे कि अशेरी पण करू भुपत बरोबर! आयला .... केवढे कष्ट ! मग कुठूनसा सेगवा नावाचा किल्ला अहमदाबाद हायवेवर आहे असं कळल. पण त्याची पण काही जास्त माहिती मिळेना. शेवटी ठरलेलाच ट्रेक करायचा असं ठरलं. त्रिंगलवाडी, सागरगड आणि कर्नाळा सारख्या चिंब करणाऱ्या ट्रेकनंतर भुपतगड? बस ??? .... मंग्या काय झालय तुला !! पण माझा हा विचार किती चुकीचा आहे हे मलाच कळून चुकलं.

पावसाला आला कि ट्रेकिंगला उधाण येतं. वरूणराजा आपल्या श्रावणसरी बरसवत, धरणीवर हिरवीगर्द गालीच्यांच्या पायघड्याच घालतो. मग सगळे निसर्गसखे हे लोभसवाण रूप पाहायला घराबाहेर पडतात.  त्यातले काही पूर्वीपासून निसर्गात रमणारे असतात, तर काहींची आत्ताच कुठे निसर्गाशी गट्टी झालेली असते. पण पावसाच्या या ४ महिन्यात सगळ्यांचा उद्देश ठरलेला ...... मनसोक्त चिंब भिजायचं , धुक्यात हरवायचं, सह्याद्रीचं हे रूपड नजरेत साठवायचं. त्यात एखादा धबधबा असला तर मग सोनेपे सुहागाच!!!

वाडा - विक्रमगडच्या पुढे पालघर जिल्ह्यात (पूर्वीचा ठाणे जिल्हा ) "जव्हार" चा परिसर तसा दुर्लक्षित .... पण अतिशय मनमोहक. माथेरान, महाबळेश्वरला  टक्कर देईल असा हा परिसर. पावसाळ्यात तर भान हरपून टाकणारा. याच जव्हारच्या १७-१८ किमी पुढे भुपतगड नावाचा एक छोटेखानी पण सुबक किल्ला आपलं वेगळेपण टिकवून उभा आहे. या पावसाळ्यात तिथे जायचा बेत आखला गेला. सोबतीला आदित्य, प्रणव, मानसी, निखील, अमेय (छोटा लांबा) या  चक्रमांचं टोळकं होतंच. तन्वी, अमृता, अनुप, सुयोग, गौरव, हरी, दिपाली, शेट्टी, वैभव, गौरी हे मित्र-मैत्रिणी पण येणार असं कळल. धमाल येणार तर !

शनिवारी ठरल्याप्रमाणे रात्री ११.३० ला मुलुंडहून जव्हारच्या दिशेने निघालो. खारीगाव टोलनाका- भिवंडी हा प्रवास (रस्त्यातल्या खड्ड्यांच्या आणि बस Driver च्या कृपेने ) बस मधला कमी आणि होडीमधला जास्त वाटत होता. वाड्याला पोहोचेपर्यंत जवळपास सगळेच झोपी गेले होते. मी, आदि , निखील, मानसी, आमच्या शेवटच्या सीट पर्यंत ऐकू जाईल अश्या हळू आवाजात गप्पा मारत होतो. वाडा-विक्रमगड-जव्हार हा रस्ता अतिशय सुंदर! इथे बाईकवर आलो तर किती धमाल येईल यावर एक परिसंवाद !  जबरदस्त वळणं मोठ्या "शिताफिनी" घेत आमचा "मायकल शुमाकर" लोकांची झोप उडवायचं काम करत होता. आता बऱ्याच लोकांना चहाची तलफ आली होती. जव्हार आलंच होतं .. आम्ही तिथल्याच शिवनेरी धाब्यावर थांबलो. मस्स्त धुक्यात हरवलेली वाट का कोण जाणे "हि वाट दूर जाते... " ची आठवण करून गेली. "स्वप्नामधील गावा"च विचार करत तिथे चहाची वाट पाहत बसलो. अर्थहीन कथानक असलेला कोणतातरी साउथचा सिनेमा तिथल्या TV वर लावला होतं (एक माणूस सापाची पुंगी वाजवतो आणि अचानक एक बाई सापाचं रूप घेते . या level चं कथानक ... या पुढे बघायची माझी हिम्मत झाली नाही) .... त्या सापानी बाकी छान अभिनय केला . :P



साखर पाक कम चहा संपवून परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. भुपतगडच्या पायथ्याचं गाव चिंचवाडी. जव्हार गावाच्या सुरुवातीलाच मुख्य रस्त्यालागतच कुलदीप म्हणून हॉटेल आहे. तिथून उजवीकडे (कुलदीप हॉटेल मुख्य रस्त्याच्या डावीकडे आणि त्याच्या समोर ) एक रस्ता जातो.
कुलदीप हॉटेल च्या पुढचा रस्ता

हा जव्हार झाप रस्ता. हा रस्ता पकडायचा. offline नकाशे मोबाईलमधे असतील तर उत्तम. त्यावर झाप हे गाव शोधावे. चिंचवाडी गाव झापच्या पुढे एखाद-दोन किलोमीटर. Driver बाकी खमक्या हवा. पूर्णवेळ रस्त्याच्या कडेला छान वनराई. पुढे चावकी नावच गाव जिथून डावीकडे वळायचं आणि सरळ सुटायचं .... रस्त्यात फोन्डीचा पाडा, पवार पाडा, श्रीरामपूर अशी गावं ओलांडून शेवटी झापला पोहोचलो. गावातच थोडी झोप काढावी असा विचार होता. पण पावसामुळे गावातल्या सगळ्या पडव्या भिजलेल्या होत्या. म्हणून चिंचवाडीच गाठली. इथेही झोपायला काही खास जागा नाही मिळाली. बस तिथेच लाऊन बस मधेच थोडी झोप काढायच ठरलं. पहाटेचे ४.३० झाले होते. अख्ख गाव अजूनही साखरझोपेतच होतं. आमच्यातलेहि काही जण पुन्हा झोपेची करुणा भाकायला लागले. आणि आम्ही निशाचर प्राणी तिथेच थोडा फेरफटका मारायला निघालो.

कोंबडा आरवला. गाव जाग होयला लागलं. फटफटायला लागलं होतं. सगळा परिसर आता उजेडात दिसू लागला. काय टुमदार गाव !

चिंचवाडी गाव 

वरुणराजाने गावावर धुक्याची जणू दुलईच अंथरली होती. मग सगळ्यांचे कॅमेरे सरसावले.

गावातच थोडा नाश्ता करून भुपतगडावर जायचं ठरलं. ब्रेड-जाम-बटर चा नाश्ता झाला. आता प्रश्न आला चहाचा. तिथेच एका घरात विचारलं " भाऊ चहा मिळेल का? " .... "मिळतंय तर .. पन त्यो दुध वाला न्हाई मिळायचा"... चालेल कि ... तसही या निसर्गाच्या सानिध्यामुळे श्रीमंत झालोच आहोत ..तर black tea घेऊ.
मग त्या मामांनी केलेला फक्कडसा कोरा चहा.

"भुपतगड कुठं ? " मामांना विचारलं.
"भोपट किल्ला ना ,,,, हा काय ... ह्ये असं सरळ सरळ जा या रस्त्यानी .... कुठबी वळायचं न्हाई ... आलंच कि मग " मामांनी सांगितलं,
"तसं काही कठीण नाही ना " ... आम्ही चौकशी केली.
" नाही नाही .... आधी तर अर्ध्यापर्यंत गाडीबी गेली असती पन आता पावसानी समदा चिखल केलाय. " .

साधारण ७.४५ वाजता आम्ही गडाच्या दिशेनी चालायला सुरुवात केली. चांगली मळलेली वाट, काही ठिकाणी चिखलानी भरलेली. चढ पण खूप जास्त नाही. गप्पा मारत मारत आम्ही साधारण रस्ता तुडवत होतो. किल्ला नक्की कोणता हे काही केल्या दिसत नव्हतं.

सुरुवातीचा रस्ता 



साधारण अर्ध्या तासात एका प्रशस्त माळरानावर पोहोचलो. ज्या डोंगराला वळसा घालत आलो त्याला मागे ठेऊन समोर बघितला कि दिसतो आपला भुपत. दिसला बाबा एकदाचा किल्ला. .... इथेच दगडावर पावलांचे आकार कोरलेले आढळतात. यालाच का कुणास ठाऊक "सीतेची पावलं" म्हणतात.
सीतेची पावले

तिथेच ओळख परेड करून घेतली,

ओळख परेड  (सौजन्य: मानसी देशमुख)


पुढची वाटचाल सुरु झाली. बऱ्यापैकी सोप्पा रस्ता पण काही ठिकाणी चिखलामुळे बराच निसरडा झाला होता. पुन्हा अर्ध्या तासात गडाच प्रवेशद्वार लागलं.
गडाचा प्रवेश 

दार अस्तित्वात नसल तरी बुरुज आणि बाजूची तटबंदी बऱ्यापैकी अवस्थेत तग धरून आहे. गडावर बघण्यासारख फार काही नाही. परंतु आस पास च्या परिसराचं सुरेख दर्शन होतं.

धुक्याचं साम्राज्य 


गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. गडावर म्हसोबा, हनुमान या सारख्या देवता लक्ष ठेऊन आहेत.

दरवाज्यातून आत थोडं पुढे चालत गेलं कि पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. त्याच्याच मागे पाण्याचा एक मोठा हौद आहे. हौदाच्या थोडसं वरच्या अंगाला पाण्याची ४-५ टाकी खोदलेली आहेत. 

पाण्याची टाकी 

आणि सोबतीला रिमझिम पावसाच्या सरी, गर्द हिरवळ आणि वेडावणार धुकं !! .... फोटो तो बनता है ना बॉस .... सगळे पाचोळ्यासारखे सैरावैरा सुटले होते. दर २ मिनिटाच्या अंतरावर एक फोटो या गतीने भुपतगडाच फोटोशूट चालू होतं. लोकांना एकत्र करून मी पण एक फोटो क्लिकला.



प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.(हि माहिती ट्रेक क्षितीजच्या संकेतस्थळावरून साभार घेतली आहे)













बऱ्यापैकी फोटोग्राफी झाली होती. १० वाजता गड उतरायला सुरुवात केली. 
रमत गमत गप्पा मारत मारत चिंचवाडी गावात यायला ११ वाजले. 
तडक निघालो जव्हारच्या दिशेनी.... धाबोसा चा धबधबा आम्हाला खुणावत होता. जव्हारला पोहोचेपर्यंत सगळ्यांना भूक लागली होती. जव्हारच्या विजयस्तंभाजवळ (clock tower) एका हॉटेल वजा टपरीवर २-४ वडापाव हाणले. तिथूनच जवळ शिरपामाळ म्हणून एक जागा आहे. ती पाहून पुढे जाण्याचा निर्णय झाला. 

शिरपामाळ प्रवेश 

शिरपामाळ स्मारक 

शिवराय सुरतेच्या स्वारीवर जाताना १६६४ साली मराठा सैन्यानी या माळावर मुक्काम ठोकला होता. महाराजांची आणि जव्हारचे राजे विक्रमशहा यांची या ठिकाणी भेट झाली होती असं इतिहास सांगतो. त्या घटनेचं स्मारक इथे बांधलं आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या जागेचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास सुरु केला. 

जव्हार-सिल्वासा रस्त्याला लागायचं. अरुंद रस्ता तसं बऱ्यापैकी स्थितीत आहे. साधारण १७-१८ किमी वर धाबोसा चा धबधबा लागतो. बऱ्यापैकी व्यावसायिकता आलीये या जागेला. बऱ्यापैकी गजबजलेली जागा झाली आहे. बरीच हॉटेल्स, दुकाने, resorts वगैरे गाडी लावायला सोय केली आहे. 

धाबोसा धबधबा 


धबधब्याच्या खाली जायला मस्तपैकी पायऱ्यांची वाट केलेली आहे. मधे काही ठिकाणी त्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. पण आरामात उतरता येईल अशी सोय आहे. धबधबा बऱ्यापैकी मोठा असल्याने त्याच्या अगदी खाली जाणे धोक्याचं ठरू शकत. पण त्या धबधब्याचे तुषार दूरवरदेखील अनुभवता येतात. 
तिथल्याच पाण्यात डुंबून अजून एक पावसाळी ट्रेकच पुण्य पदरात पाडून घेतलं. मनसोक्त भिजून झाल्यावर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथेच बाहेर नदीकाठी पेटपूजा आटोपली.

जुगाड : हा प्रकार वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी लावलेला आढळला. 


या ट्रेकनी मला एक गोष्ट पुन्हा एकदा दाखवून दिली. जागा हि कधीच चांगली किंवा वाईट नसते .... आपण ज्यांच्याबरोबर तिथे जातो ते त्या जागेला सुंदर बनवतात. आधी आम्हाला वाटत होतं "कायचा भुपतगड ... एक ढेंग टाकली कि आला !!! तिथं कसला ट्रेक !!! " ..... पण गडावरच्या त्या रम्य धुक्याचा तो अनुभव म्हणजे स्वर्गसुख .... तिथेच राहावं असा ... आणि शेवटी धाबोसा म्हणजे तर त्या स्वर्गीय आनंदाचा कळसच !! खरच हा सगळा परिसर म्हणजे खऱ्या अर्थानी महाराष्ट्राचं "जवाहर" आहे. शहरी गजबजाटापासून दूर ... शांत, रम्य, प्रसन्न 

आणखीन एक पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण ! भेटूच पुढच्या ट्रेक ला !!


No comments:

Post a Comment